Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्यामध्ये सातत्यानं वाढणाऱ्या तापमानानं हवामान विभागासह नागरिकांच्याही चिंतेत भर टाकली असतानाच आता ही चिंता वाढवणारा आणखी एक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 24 तासांसाठी हा अंदाज लागू असून हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात वाढलेला उकाडा पाहता त्यामुळंच हवामान स्थितीत बदल होत असून, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. किनारपट्टी क्षेत्रात याचा परिणाम दिसणार असून, त्यानंतर उष्ण, दमट वातावरण राहण्याचा अंदाज आहे. वाऱ्याचा दबाव आणि समुद्रातील तापमानामुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
इथं किनारपट्टी क्षेत्रावर पावसाचं सावट असतानाच विदर्भ मात्र सातत्यानं होरपळत आहे. चंद्रपूर, वर्धा इथं पारा 38 अंशांपर्यंत पोहोचला असून, तिथं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगलीमध्येही पारा 36 अंशांपलिकडे पोहोचला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दुपारच्या वेळी उष्मा वाढला असून, उष्णतेच्या झळांमुळं नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी उष्माघातापासून बचावासाठीचे प्रतिबंधात्मक उपाय वापरात आणण्याचा सल्ला दिला जात आहे. हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार यंदाच्या मार्च महिन्यामध्ये उष्णतेच्या लाटा मोठ्या प्रमाणावर येणार असून, त्यामुळं हा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार आहे.
देशाच्या उत्तरेकडे जोरदार बर्फवृष्टी….
फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशाच्या दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपपर्यंत प्रत्येक राज्यात हवामानाची वेगळी स्थिती पाहायला मिळत आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार 3 मार्चपासून एक पश्चिमी झंझावात सक्रिय होत असून, त्यामुळं पर्वतीय भागांमध्ये तूफान हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीसह बर्फवृष्टीचीसुद्धा शक्यता असल्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रामुख्यानं 3 मार्च रोजी हिमाचल प्रदेशातील चंबा, मंडी, कुल्लू, शिमला, सोलन, सिरमौर इथं प्रचंड हिमवृष्टीची शक्यता असून, उत्तराखंडच्या पिथौरागढ, बागेश्वर, टिहरी इथं जोरदार पाऊस आणि हलक्या बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
