
Maharashtra ST Bus News Updates: राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने बहुचर्चित ‘शिवशाही’ बससंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्यापासून ‘शिवशाही’ बसने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. वाहतुकीच्या स्पर्धेत ‘शिवशाही’ अग्रगण्य ठरत होती. परंतु, आता एसटी महामंडळाचा मोठा ब्रॅण्ड असलेली ‘शिवशाही’ हळुहळू बंद होण्याच्या मार्गावर आहे. ‘शिवशाही’ चे रुपांतर ‘हिरकणी’ बसमध्ये करण्यात येत आहे. ‘शिवशाही’चे रुपांतर झालेली पहिली ‘हिरकणी’ बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाली असून लवकर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
‘शिवशाही’ रस्त्यावर दिसणार नाही
एसटी महामंडळ सर्व ‘शिवशाही’ बस, टप्प्याटप्प्याने ‘हिरकणी’मध्ये परावर्तित करणार असून भविष्यात ‘शिवशाही’ बस राज्यातील रस्त्यावर धावताना दिसणार नाही. एसटी महामंडळाने वातानुकूलित ‘शिवशाही’ बस ‘हिरकणी’ बसमध्ये परावर्तित करण्याचे नियोजन केले. पुण्यातील दापोडी येथील एसटीच्या छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत ‘शिवशाही’ बसचे ‘हिरकणी’ बसमध्ये रूपांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दापोडी येथे टाटा ‘शिवशाही’चे ‘हिरकणी’मध्ये रूपांतर झाले असून, ही बस लवकरच प्रवासी सेवेत दाखल होणार आहे.
का केला जाणार हा बदल?
एसटी महामंडळाच्या ताफ्यात 792 वातानुकूलित ‘शिवशाही’ बस आहेत. या सर्व बसचे रुपांतर ‘हिरकणी’मध्ये करण्यात येणार आहे. ‘शिवशाही’ बसमधील वातानुकूलित यंत्रणेमुळे इंजिनवर जास्त भार येत होता. त्यामुळे ‘शिवशाही’ची वातानुकूलित यंत्रणा बंद करून ‘हिरकणी’त परावर्तीत करण्यात येणार आहे. त्यामुळे इंजिनवरील भार कमी होईल. शिवशाहीच्या रंगसंगतीत बदल करण्यात येणार आहे. तसेच, आसनात बदल केला जाणार आहे. ‘हिरकणी’मध्ये ४४ आसने असतील.
आठ वर्षातच ‘शिवशाही’ला घरघर
मुंबई – रत्नागिरी मार्गावर 10 जून 2017 रोजी शिवशाही बस सुरू झाली. राज्यातील 75 मार्गांवर शिवशाही धावू लागली. बसमध्ये शयनयान आणि आसन असे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. एसटी महामंडळाने प्रवाशांना लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी वातानुकूलित, आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा मिळावी म्हणून ‘शिवशाही’ आपल्या ताफ्यात दाखल केली. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली. महामंडळ आणि खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून ‘शिवशाही’ चालविण्यात येत होती. यासाठी सात कंत्राटदार नेमण्यात आले होते. आसन व्यवस्था असलेल्या बस आणि तीन कंत्राटदार शयनयान सेवा असलेली शिवशाही चालवित होते. आठ वर्षातच ‘शिवशाही’ला घरघर लागली असून ती लवकरच सेवेतून बाहेर जाणार आहे.