
Nishikant Dubey Reaction: खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान केले. यानंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर टिका करण्यात आली. यानंतर निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी धडा शिकवल्याचं चित्र पाहायला मिळालं. संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. ‘जय महाराष्ट्र’ च्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला. यानंतर दुबेंची चांगलची नाचक्की झाली. दरम्यान आज संसदेत बोलताना दुबेंनी त्या घटनेवर भाष्य केलं. काय म्हणाले दुबे? सविस्तर जाणून घेऊया.
कुठून सुरु झाला वाद?
राज्यामध्ये पहिल्या इयत्तेपासून त्रिभाषासूत्रीच्या माध्यमातून हिंदी लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांपैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि राज ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर 5 जुलै रोजी हिंदीच्या सक्तीविरोधात मुंबईत दोन्ही ठाकरे बंधुंच्या पक्षाने संयुक्त मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मात्र त्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषासूत्रीचा शासन आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली. यानंतर पाच जुलै रोजी वरळीमधील डोम येथे झालेल्या संयुक्त जल्लोष मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी मराठीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. याच मेळाव्यावर बोलताना दुबेंचा तोल सरकला आणि त्यांनी मराठी तसेच महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त विधानं केली.
दुबेंनी काय दिली होती प्रतिक्रिया?
जाणूनबुजून मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीयांविरोधात राज्यात वातावरण तापले असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी बिहारला यावे, तेथे त्यांना ‘पटक-पटक के मारेंगे’ असे आव्हान दुबे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिले होते. ‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो’ अशी दर्पोक्तीही दुबेंनी केली होती. याच दुबेंना बुधवारी मराठी महिला खासदारांनी खिंडीत गाठले. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार दुबे यांना शोधत होत्या. दुबे लॉबीमध्ये येताच तिघींनी त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला.
महिला खासदार दुबेंना काय म्हणाल्या होत्या?
बुधवारी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर यांनी दुबेंना गाठण्याचं ठरवलं. कामकाज तहकूब झाल्यापासून या तिन्ही महिला खासदार भाजपा खासदार दुबे यांना शोधत होत्या. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या तीन महिला खासदारांकडून दुबेंचा शोध सुरु असतानाच ते लॉबीमध्ये दिसले. या तिघींनी लगेच त्यांना घेराव घातला आणि त्यांच्या विधानांबाबत जाब विचारला. “मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही… मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही” अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सर्वांसमोर संसदेच्या लॉबीमध्येच सुनावले. यानंतर या महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणाबाजी केली. दुबे गोंधळलेल्या अवस्थेत या तिघींसमोरुन निघून गेले.
त्या घटनेवर काय म्हणाले निशिकांत दुबे?
लोकसभेत खासदार निशिकांत दुबे हे काश्मीर प्रकरणावर बोलत होते. त्यावेळी त्यांना विरोधी बाकावर बसलेल्या खासदारांकडून विरोध होत होता. तसेच शेरेबाजी केली जात होती. यावेळी खासदार वर्षा गायकवाड यांना उद्देशून त्यांनी भाष्य केले. वर्षा गायकवाड यांना हेदेखील माहिती नाही. लॉबीमध्ये जे चालत ते मजा मस्ती असते. त्याच्या बातम्या नाही होऊ शकत असे निशिकांत दुबे म्हणाले.